Wednesday 30 August 2017

‘निर्णया’मधील भावना

निर्णय घेण्याबाबत रवींद्रनाथ टागोरांनी अतिशय छान लिहून ठेवलय. ते म्हणतात....

निर्णय घेताना मन दोलायमान झाले तरी चालेल,
निर्णय चुकीचा झाला तरी एक वेळ चालेल,पण निर्णय घेताच येऊ नये ह्यासारखे दुर्भाग्य कुठले?

आणि खरोखरच निर्णय घेताना ‘हो का नाही?’ ‘चूक का बरोबर?’अशी मनाची दोलायमान परिस्थिती होऊ शकते.त्यातूनच निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु होते.कधी निर्णय बरोबर ठरतात तर कधी चुकतातही... पण निर्णय घेता न येण्यासारखी परिस्थिती मात्र सर्वात खेदजनक नाही का? काही निर्णय भावनांच्या भरात घेतले जातात, तर काही निर्णय भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून घेतले जातात.दोन्हीही पर्याय खरतर दूरगामी परिणामांचा विचार केला तर योग्य नाहीत. निर्णय प्रक्रियेमध्ये आपण भावना बाजूला ठेवून फक्त विचारांच्या जोरावर (Rational) निर्णय घेतो ह्या जुन्या विचारप्रणालीला धक्का देणारे निष्कर्ष संशोधनातून निष्पन्न झाले आहेत.योग्य निर्णय कसा घ्यायचा?आपली निर्णयप्रक्रिया कशी काम करते? निर्णय घेताना आपण नक्की काय करत असतो? फक्त  चारांच्या जोरावरच आपण निर्णय घेतो का?मग निर्णयप्रक्रियेमध्ये भावनांचं काही स्थान आहे का ?GUT FEELING म्हणजे नक्की काय? ह्या व अशा अनेक प्रश्नांवर आणि निर्णयप्रक्रियांवर आता खूप अभ्यासपूर्ण संशोधन झाले आहे,चित्तवेधक प्रयोग झाले आहेत.त्यासंबंधी थोडेसे ...

इलिओट,अमेरिकेमधील एक अतिशय बुद्धिमान व नामांकित वकील..त्याच्या व्यवसायामध्ये अत्यंत यशस्वी. ऐन तिशीमध्ये त्याला दुर्दैवाने ब्रेन ट्युमर हा आजार होतो.कपाळाच्या मागच्या मेंदूमधील भागात एक लसुणाएवढी गाठ निर्माण होते.ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो.अद्ययावत रुग्णालयात त्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडते.डॉक्टरांतर्फे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे आणि ती गाठ पूर्णपणे काढल्याचे सांगण्यात येते. ऑपरेशन नंतर मात्र इलिओटचे आयुष्य अगदी बदलून जाते. व्यवसायामध्ये चुकीच्या दिशेने पावले पडावयास लागतात,केसेस मध्ये खूप चुका व्हावयास लागतात, करिअरला उतरती कळा लागते.पैशाच्या गुंतवणीबाबतही चुकीची पावले पडून खूपच नुकसान सहन करावे लागते.पतीपत्नी संबंधामध्ये दुरावा निर्माण व्हावयास लागतो.चुकांची पुनरावृत्ती होत असते.त्याच्या जवळच्या नातेवाइकांनाही अस्वस्थ आणि व्यथित करणारे आचरण त्याच्याकडून होत असते.आपल्या ह्या घसरणीचे कारण त्याला स्वतःलाही उमजत नसते.तसं बघितलं तर त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमता ऑपरेशन आधी जशा होत्या तश्याच तल्लख असतात.त्याला काही मानसिक आजार अथवा व्याधी नाही ना हे बघण्यासाठी सर्व निष्णात डॉक्टरांकडे त्याची तपासणी केली जाते.सर्व रिपोर्ट्स पुर्णपणे नॉर्मल येतात.सर्वांनाच चक्रावून टाकणारी परिस्थिती त्याच्या आयुष्यात निर्माण होते.अशा परिस्थितीत तो हतबल होऊन एकदा डॉ.दिमासिओ नावाच्या मेंदुशास्त्रज्ञाकडे भेटावयास जातो.दिमासिओ सुद्धा त्याची पूर्ण तपासणी करतो,पण सर्व नॉर्मल..! केबिन मधून बाहेर पडताना डॉक्टर त्याला एकच प्रश्न विचारतात... “इलिओट,आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा कधी भेटू शकतो? इलिओटला ह्या प्रश्नाला अचूक उत्तर देण्यासाठी एक योग्य दिवस आणि एक वेळ निश्चित करून सांगणे अपेक्षित असते.पण सांगताना तो पुढील आठवड्यातील पाच वेगवेगळ्या वेळा डॉक्टरांसमोर ठेवतो पण त्यामधील एक योग्य वेळ निवडून सांगू शकत नाही.मंगळवारी दहा वाजता,का बुधवारी चार वाजता का आणिक कुठल्या वेळी चालेल.. हे निश्चित करून सांगणे त्याला जमत नाही. इथे त्याला योग्य निर्णय घेणे,योग्य पर्याय अचूकपणे निवडणे अपेक्षित असते.पण अतिशय बुद्धिमान असूनही ते त्याला अजिबात जमत नसते.तो अविचारी नसतो.निर्णय घेताना लागणारी रुक्ष माहिती,data जमवण्याची प्रक्रिया उत्तम होत असते. पण त्यातून एकच योग्य पर्याय निवडणं अवघड होत असत. हा सर्व अनपेक्षित प्रकार बघून डॉक्टर दिमासिओ च्या डोक्यात लख्खं प्रकाश पडतो.. इलिओट,वर जे ऑपरेशन झालेले असते ते खरतर यशस्वी होते पण ट्युमर काढताना विचार निर्माण होणारा मेंदूचा भाग आणि भावनांचा उगम होणारा भाग ह्यांमधले पेशिजालाचे महत्वाचे दुवे कापले गेले असतात… म्हणजेच इलिओट च्या निर्णयप्रक्रियेमध्ये कुठेतरी बिघाड निर्माण झाला आहे,असे निष्पन्न होते.निर्णय घेता न आल्यामुळे किंवा चुकीचे निर्णय वारंवार घेतल्यामुळे त्याला व्यवसायात,विवाहबंधनात आणि पैशाच्या गुंतवणुकी मध्ये मोठा तडाखा बसलेला असतो.
निर्णय प्रक्रियेमध्ये आपण फक्त विचारांच्या जोरावर (Rational) निर्णय घेतो भावना तेव्हा बाजूला ठेव्याव्या लागतात ह्या जुन्या विचारप्रणालीला धक्का देणारे निष्कर्ष संशोधनातून निष्पन्न झाले आहेत.इलिओट च्या बाबतीत खऱ्या घडलेल्या गोष्टीमधूनही हाच निष्कर्ष प्रतीत होतो तो म्हणजे विचारांना भावनांची जोड नसेल तर घेतलेले निर्णय कमकुवत ठरू शकतात.भावना आणि विचार एकमेकांच्या विरुद्ध नसून एकमेकांना पोषकच असतात. निर्णयप्रक्रियेमधील भावनांचं स्थान काय ? हे शोधण्यासाठी एक असामान्य प्रयोग करण्यात आला .डॉ  मासिओने हा विख्यात प्रयोग केला होता. Gambling Experiment म्हणून हा प्रचलित आहे.

जुगाड प्रयोग (Gambling Experiment)

ह्या प्रयोगात पत्यांचे चार डेक्स ठेवलेले असतात (A,B,C,D).प्रत्येक व्यक्तीला त्या चार डेक्स मधून एकूण शंभर पत्ते न बघता एक एक करून कुठल्याही डेक मधून काढून जमवायचे असतात.त्या पत्त्यांच्या डेक्समधून जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पत्ते निवडण्याचं आव्हान त्यांना असतं. त्या डेक्स पैकी दोन डेक्स मध्ये काही पत्ते जास्त कमाई (भरपाई) म्हणजेच शंभर डॉलर मिळवून देणारे असतात परंतु त्याच डेक्स मध्ये जबरी पेनल्टी देणारेही पत्ते ठेवलेले असतात .बाकीच्या दोन डेक्स मध्ये कमी कमाई(भरपाई )म्हणजेच फक्त पन्नास डॉलर मिळवून देणारे पत्ते असतात पण ह्या डेक्स मध्ये अगदी क्षुल्लक पेनल्टी देणारे पत्ते असतात.कुठल्या  प्रकारचे पत्ते कुठल्या डेक मध्ये आहेत हे कुणालाच माहिती नसतं.आता दोन गट पाडले जातात.एका गटामध्ये पूर्वी मेंदूमध्ये विशिष्ठ भागाला इजा झालेल्या व्यक्ती असतात तर दुसऱ्या गटामध्ये पूर्णपणे निरोगी मेंदूचे कार्य असलेल्या व्यक्ती असतात.जास्त फायद्याचे पत्ते निवडण्याचा जुगाड (gambling) खेळ सुरु होतो आणि प्रयोगही...! सुरुवातीस वीस पत्ते निवडताना दोन्हीही गटामध्ये साधारण सारखेच नुकसान सहन करावे लागते.पण त्यानंतर मात्र निरोगी व्यक्ती पत्ते निवडताना मागे झालेल्या चुकांचा अंदाज घेऊन,Gut Feeling द्वारे कमी भरपाई पण कमी नुकसान देणा-या डेक्स मधून पत्ते निवडण्यास सुरुवात करतात. त्यामुळे उरलेल्या पात्यांमधून त्यांना भरपूर कमाई आणि कमी नुकसान सहन करावे लागते.ह्याउलट ज्यांचा भावनांशी संपर्क तुटलेला असतो अशा त्या व्यक्तींचा गट मात्र पूर्वीच्या चुकांमधून काहीच न शिकता जास्त भरपाई व जास्त पेनल्टी देण्याऱ्या डेक्स मधून पत्ते निवडत राहतात आणि शेवटी त्यांना जबरी नुकसान सहन करावे लागते. भावनांशी त्यांचा संपर्क तुटल्यामुळे त्या गटातील व्यक्ती चुकीचा निर्णय घेत राहतात.कुठल्या डेक्स मधून पत्ते निवडल्यास आपल्याला जास्त फायदेशीर ठरेल आणि कमी नुकसान होईल ह्याचा अचूक कयास ते बांधू शकत नाहीत. ह्या प्रयोगातून असे निष्पन्न झाले आहे की अचूक निर्णय घेताना आपण विचार करणारा(तार्किक)मेंदूचा भागच फक्त वापरत नसून भावनांचा स्त्रोत असलेला भाग ही उपयोगात आणतो.भावनिक स्मरणशक्ती ही निर्णय घेताना,पर्याय निवडताना अत्यावश्यक ठरते. “हे आवडतंय का नाही”, “हे बरोबर का चूक”, “हे नुकसानीचे का फायद्याचे” “ह्यामध्ये धोका आहे अथवा नाही” ह्याबद्दल गतकाळच्या साठवलेल्या भावनिक नोंदींचा इथे मेंदूमधील दुव्यांच्या मार्फत उपयोग करण्यात येतो.ज्यांच्या मेंदूमध्ये ह्या दुव्यांमध्ये इजा झालेली असते त्या व्यक्ती अर्थातच योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत !

आता ह्या प्रयोगाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुयोग्य निर्णय घेताना कसा उपयोग करू शकतो ? आपण नित्यनेमाने छोटे-मोठे निर्णय सतत घेत असतो.अगदी “कुठले कपडे आज घालायचे” “दुकानात गेल्यावर कुठला ड्रेस निवडायचा”ह्या छोट्या निर्णयापासून “कुठले करिअर निवडायचे”,“कोणाशी लग्न करायचे” ह्या मोठ्या निर्णयांपर्यंत विविध प्रकारचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात.असे निर्णय पूर्णपणे आपल्याला स्वतःलाच घ्यावे लागतात.योग्य झाले तर ठीक पण अयोग्य झाले तर जबाबदारी आपलीच असते.आणि कधी कधी चुकीच्या निर्णयामुळे जीवनामध्ये जबर किंमत मोजावी लागते किंवा चुकीच्या निर्णयाचे पूर्ण खापर आपल्यावरच फोडले जाते.... 

असे असताना मग योग्य निर्णय कसा घ्यायचा? डॉ केप्लर ह्या जगतविख्यात खगोलशास्त्रज्ञाला हाच प्रश्न स्वतःच्या आयुष्यात “कुणाशी लग्न करायचे” हा महत्वाचा निर्णय घेताना पडला.विश्वातील ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींवर अदभुत संशोधन करणाऱ्या ह्या संशोधकासमोर ‘वधुसंशोधानाचे’ आव्हान आले होते. त्याच्यासमोर अकरा मुलींची स्थळं होती.त्यातून एक भावी पत्नी म्हणून निवडायची होती.हे आव्हान पेलताना योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांनी एक अफलातून गणिती फोर्मुला काढला.“The Marriage Problem”म्हणून तो फोर्मुला जगभर प्रसिद्ध आहे.अचूक निर्णय घेण्यासाठी आपण हा केप्लरचा फोर्मुला नक्कीच उपयोगात आणू शकतो.समोर असलेल्या अनेक पर्यायांमधून आपली भावी पत्नी किंवा पती निवडण्यासाठी,व्यवसायात योग्य सहायिका नेमण्यासाठी,अगदी खेळातील योग्य टीम निवडण्यासाठी ह्या फोर्मुलाचा उपयोग करता येऊ शकतो.हे कसं करायचं? कल्पना करा....तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सहाय्यक निवडायचा आहे.जवळ जवळ वीस जणांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत.केप्लर च्या फोर्मुला प्रमाणे तुम्ही त्यातील अंदाजे एक त्रितीयांश (३६.८%) म्हणजे सात जणांचाच इंटरव्ह्यू घ्यावयाचा.ह्या पहिल्या ग्रुप मधील तुमच्या मते सर्वात योग्य अर्जदाराची मनात नोंद करून ठेवा.त्यानंतर उरलेल्यांचा इंटरव्ह्यू घ्या.आता त्यामधील एखादा पहिल्या ग्रुप मधील ‘सर्वात योग्य’ पेक्षाही चांगला वाटला तर त्यालाच अंतिम म्हणून निवडा आणि तिथेच निवड प्रक्रिया थांबवा.Optimal Stopping म्हणजे निवड करताना कुठे थांबायच ह्याबाबत महत्वाच तंत्र इथं प्रतीत होते.गणिती विचारप्रक्रिया आणि Gut Feeling दोन्हीच्या समन्वयामुळे योग्य निर्णय घेण्यास मार्ग मोकळा होतो ... केप्लरला ही अकरा मधून योग्य भावी पत्नी निवडण्यास ह्याच उपयोग झाला..


By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.

Thursday 24 August 2017

विवाहबंधनातील भावनांचे प्रयोग

विवाहबंधनातील भावनांचे प्रयोगविवाह म्हणजे दोन व्यक्तींचे मनोमिलन ....दोन कुटुंब आणि त्यामधील सर्वांच्या भावनांना एकत्र आणणार माध्यम ..प्रेम,जिव्हाळा,आदर,सन्मान,आपुलकी तसेच राग,भीती,घृणा, असुया,आणि निराशा ह्या व अशा असंख्य भावनांचं एक अनोख दालन.खरतर ‘विवाह’ ही माणस जोडणारी,सहसंवेदना जपणारी आणि जाणीवा जागृत करणारी आश्वासक संस्था.पण ह्या विवाह्संस्थेबद्दल,तिच्या मुलभूत कार्यकारणाविषयी शंका निर्माण होईल अशी धक्कादायक परिस्थिती सध्या सर्व जगभर दिसत आहे.चाळीस ते पन्नास टक्के विवाह लग्नानंतर काही वर्षातच भंग पावत आहेत..आणि आता तर लग्न ते घटस्फोट हा कालही कमी होत चालला आहे विवाहसंबंधातील आणि त्या नात्यामधील एकसंधपणा हा ‘भावनिक सुसंवादावर’ अवलंबून असतो.नातं हे फुलण्याच्या ऐवजी तुटत कस जातं?..विवाह मोडण्याच्या पाऊलखुणा निर्माण कशा होतात? हे आता अनोख्या भावनांच्या प्रयोगशाळांमध्ये निर्विवाद सिद्ध होत आहे.अशा अदभूत विवाह ‘प्रयोगशाळेविषयी’.....

श्री :“माझे कपडे धोब्याकडे टाकलेस का ?”
सौ :(उपरोधिक आवाजात) ... “माझे कपडे धोब्याकडे टाकलेस का ?” तुला नाही टाकता येत? मी काय तुझी
दासी आहे,सारखं तुझ्या मागे मागे नोकरासारखं फिरायला?
श्री:(दबक्या आवाजात)..“दासीच बरी तुझ्यापेक्षा, ही कामे तिला वेळेवर नीट जमली तरी असती...”
हा संवाद एखाद्या टीव्ही सीरिअल मधील असता तर एकवेळ ठीक होत, पण एखाद्या घरात जर हे व असे
तिखट उपरोधिक बोलणे नित्यनेमाने होत असेल तर ..

हा खराखुरा प्रसंग आहे जॉन गॉटमन ह्यांच्या ‘विवाह प्रयोगशाळेमधला’..ह्या प्रयोगशाळेमध्ये गेली तीस वर्ष हा मानसशास्त्रज्ञ विवाहबंधनामधील भावनिक संवादावर संशोधन करीत आहे..घरामध्ये श्री व सौ मध्ये होणारे संवाद विडीओ टेप करून ह्या प्रयोगशाळेमध्ये बघितले जातात..त्यावर मग सर्व वैज्ञानिक तासन तास बसून सूक्ष्म निरीक्षणातून त्या संवादातील भावनिक अभिव्यक्तीचे परीक्षण(micro analysis)करतात..शेकडो जोडप्यामधील अशा संवाद निरीक्षणामधून मग संवादातील चुकांचा (fault lines) चा अभ्यास केला जातो...एखादे जोडपे पुढे जाऊन तीन वर्षात घटस्फोटापर्यंत जातील का ? ह्याचा अनुमान ह्या परीक्षणातून केला जातो.अशा अदभूत प्रयोगशाळेतील निष्कर्ष हे जवळ जवळ 95 टक्के खरे होतात असे निष्पन्न झाले आहे.इथे कुठेही ढोबळ भविष्यवाणी नसते,किंवा ज्योतिषशास्त्र वापरले जात नाही पण इथे संवादातील भावनिक अंतरंगाचा सूक्ष्म अभ्यास करून अचूक अंदाज बांधले जातात..आणि ते सुद्धा तंतोतंत खरे... काही नवविवाहित तर काही जुनी जोडपी इथे परीक्षणासाठी असतात.जोडप्यामधील व्यक्तींचे सेनसर्स च्या माध्यमातून सूक्ष्म निरीक्षण केले जाते..त्यांच्या देहबोलीचा,चेहऱ्यावरील microएक्सप्रेशनचा,हृदयाची गती आणि शरीरात निर्माण होणाऱ्या संप्रेरकांचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला जातो..त्यातूनच मग हे अचूक अनुमान केले जातात.त्यानंतर मग जोडप्यामधील व्यक्तीला प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे बोलावले जाते आणि तीच विडीओ टेप परत दाखविली जाते.अशा प्रसंगात तो वादळी संवाद चालू असताना मनामध्ये कुठले विचार होते,नेमकं मनामध्ये काय चालल होतं ह्यासंबधी त्यांना बोलतं केलं जातं.मनाच्या स्क्रीन वरील भावनांच्या नाजूक ठश्यांचे निरीक्षण केले जाते..जसं काही ह्या विवाह प्रयोगशाळेत त्यांची भावनिक क्ष-किरण तपासणीच होत असते!!

संवादातील धोक्याच्या घंटा कुठल्या?जोडप्यामध्ये वाद होत असताना मत मांडली कशी जातात? दुसऱ्या व्यक्तीला समजुन घेतलं जातं अथवा नाही? मतभिन्नता कशी व्यक्त केली जाते ? बोचरी टीका केली जाते का दुसऱ्याच्या भावना स्वीकार केल्या जातात ?
विवाह्बंधानामध्ये तडे जायला कशी सुरुवात होते? ह्या व अशा असंख्य निरीक्षणातून विवाह संबधातील व ऋणानुबंधातील भावनिक दुव्यांचा खोलवर जाऊन अभ्यास केला जातो..नातेसंबंधावर भावनांचा किती प्रभाव आहे हे ह्यामधून अधोरेखित होते...
ह्या विवाह प्रयोगशाळेतील परिक्षण केलेला असाच एक खराखुरा प्रसंग .....

प्रिया,तिची मुलगी साना आणि नवरा नील मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातात.प्रिया आणि मुलगी कपड्यांच्या दुकानात जातात तर नील इलेक्ट्रोनिक डिजिटल शॉपमध्ये खरेदी करावयास जातो.शॉपिंग झाल्यानंतर एक तासात मॉलच्या दाराशी जमायचं ठरतं.त्यानंतर लगेचच बाजूच्या थीएटरमध्ये आयत्यावेळेला तिकीट काढून दुपारचा सिनेमा पहायचं ठरतं.प्रिया नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचते पण नीलला उशीर होतो ... “कुठे गेलाय हा ? सिनेमा सुरु व्हायला फक्त १० मिनिटं उरली आहेत.मोबाईल ही उचलत नाहीय..आयत्या वेळेस नेमकं उशीर करून पूर्ण आनंदावर विरजण टाकायची सवयच आहे तुझ्या बाबांची” प्रिया मुलीला तक्रारीच्या सुरात सांगत असते.तुझ्या बाबांचं नेहमीचच आहे हे,एक गोष्ट नीट करतील तर शपथ”. नील दहा मिनिटात पोहोचतो. ”जुना मित्र मध्येच भेटल्यामुळे उशीर झाला,sorry” असं म्हणून तो सारवासारव करावयास सुरुवात करतो.प्रियाचे उपरोधिक बोलणे काही थांबत नाही. “हं..या..आलास ...चांगलं काही ठरवलं की त्याचा विचका कसा करायचा हे तुला कसं अचूक जमत ह्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो,किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेस तू ?”

सूचना,तक्रार आणि वैयक्तिक टीका ह्या मध्ये फरक असतो.इथे पूर्ण व्यक्तिमत्वावर व चारित्र्यावर दोषारोप केले गेले.बेजबाबदार व स्वार्थी अशी लेबलं लावून पूर्ण व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडवले गले.हे सर्व योग्य शब्दात,परखडपणे पण उपरोधिक न होता सांगता आले असते पण प्रियाला ते जमले नाही.अर्थात भावनांबद्दलच्या काही मुलभूत कौशल्यांचा अभाव ह्याला कारणीभूत होता.हे असं जर वारंवार घडत गेलं तर तर ह्या नात्याचं पुढे काय होईल ते काही वेगळे सांगायला नको.. विवाहाची गाडी रुळावरून घसरण्यास
अशीच सुरुवात होते... सखोल प्रयोगातून अशा अनेक संवादातील संभाव्य धोक्याबद्दल मार्मिक वेवेचन विवाह प्रयोगशाळेमध्ये करण्यात येतात ..संवादामध्ये नेमकं काय व कसं बोलायचं आणि काय टाळायचे हे सुचवण्यात येते जोडप्यांमधील संवादामध्ये टीका,तक्रार अजिबात करायचीच नाही असे नाही.इथे प्रिया आणि नील मधील संवादाचा रोख व्यक्तिमत्वाकडे न जाता व्यक्तीच्या न पटलेल्या कार्यपध्दतीकडे व वर्तनाकडे असावयास हवा होता.काही मुलभूत ‘भावनिक कौशल्य’ असती तर कदाचित संवाद असा झाला असता .... “तू वेळेवर पोहोचला नाहीस की मला अतिशय चीड येते,आधी ठरवून सुद्धा उशीर झाल्यामुळे आम्हाला ताटकळत बसल्यासारखे वाटले आणि आता सिनेमा ही वेळेवर बघता येणार नाही, कदाचित मित्राला तू घाईत आहेस हे सांगता आले असते” इथे स्वतःच्या भावना व्यक्त केल्या जातात,अपेक्षा आणि गरजा सांगितल्या जातात व कुठली कृती आवडली असती हेही अभिव्यक्त केले जाते पण कुठेही पूर्ण व्यक्तिमत्वावर बोचरी टीका न करता आणि त्यात उपरोधीकपणा किंवा तिरस्कार न आणता !! दुसऱ्या व्यक्तीला इथे चुकीच्या कृतीची जाणीव करून दिली जाते पण चूक सुधारण्याची संधीही दिली जाते. मुख्य म्हणजे कुठेही दुसऱ्या व्यक्तीला अपमानित करतोय, तुच्छ लेखतोय किंवा सदोष व्यक्तिमत्व आहे असा संदेश दिला जात नाही.नातं जपण्यासाठी आणि अधिक फुलविण्यासाठी हेही नसे थोडके!! 

टीका आणि तक्रार ह्यामधील फरक उधृत करणारी ह्या विवाह प्रयोगशाळेतील काही बोलकी उदाहरणे....
टीका: आपल्याला एवढा घरखर्च असताना तू कपड्यांवर एवढा खर्च कसा करू शकतोस ? किती बेजबाबदार
आणि स्वार्थी आहेस तू ?
तक्रार: तू कपड्यांवर खूपच खर्च केला आहेस,मला आपल्या आर्थिक स्थितीबद्दल काळजी वाटते

टीका :तू नेहमी स्वतःचच फक्त बघतोस,दर वीकेन्डला आम्हाला एकट सोडून तू निर्लज्जासारखा बाहेर
टवाळक्या मारतोस
तक्रार :तू वीकेन्ड ला मित्रांबरोबर बाहेर जातोस तेव्हा मला घरी खूपच एकट वाटतं
टीका :तुझे जमिनीवर लोळत असलेले कपडे उचलून मी अतिशय कंटाळली आहे,किती आळशी आणि वेंधळा
आहेस तू ?
तक्रार :तुझे सगळे कपडे तसेच जमिनीवर पडलेले असतात,त्यामुळे आपलं घर अतिशय अस्वच्छ दिसतं

गॉटमन ह्यांच्या विवाह प्रयोगशाळेमध्ये संवादातील उपरोधीकपणा,घृणा व तिरस्कार ह्या भावना तपासल्या जातात.देहबोली व चेहऱ्यावरील स्नायूंचा सूक्ष्म अभ्यास करून शब्दांपलीकडील संवादाविषयी जोडप्यामध्ये भान निर्माण केले जाते. ह्या प्रयोगशाळेत एक धक्कादायक पण बोचरं वैज्ञानिक सत्य समोर आलं आहे.

जर जोडप्यामधील संवादामध्ये सौ च्या चेहेऱ्यावर ’घृणा’ ही भावना पंधरा मिनिटात चार ते पाच पेक्षा जास्त वेळा व्यक्त झाली तर तो विवाह पुढील चार वर्षात भंग पावण्याच्या त्या हुकमी पाऊलखुणा समजाव्यात !!

एका घरात मुलांनी उछाद मांडलेला असतो.सतत भांडण चालू असतात.मंदार अतिशय अस्वस्थ होऊन आपल्या पत्नी मीनलला तक्रारीच्या सुरात....

“मीनल,तुला नाही वाटत मुलांनी थोडा शांत व्हावं? (मनातले अतिरेकी विचार...ही मुलांना खूपच मोकळीक
देते आणि अवास्तव लाडही करते) मंदारचा तिरकस प्रश्न ऐकून मीनल थोडी चिडचीडत... 
“मुलं मजा करतायत ना ..आणि झोपतीलच आता थोड्या वेळात (मनातील अतिरेकी विचार.. झालं ह्याचं सुरु
नेहमीचं तक्रार करणं..) मंदारचा रागाचा पारा वाढत जातो, दात ओठ खाण व हात झटकणं चालू होतं..
“आता त्यांना सरळ केलेच पाहिजे..झोपोवतोच त्यांना आत्ता...”(अतिरेकी विचार..प्रत्येक गोष्टीत मध्ये आडवी
येते ही..आता मला सर्व माझ्याच हातात घेतलं पाहिजे)
“नको..जाऊदे...मीच त्यांना झोपवते आता... तुझी सारखी कुरकुर आणि तक्रार ऐकण्यापेक्षा...” (बापरे! हा
आता रागाच्या भरात काहीही करेल..)
जोडप्यांमधील संवादात काय बोललं जातं (व्यक्त),त्यावेळी देहबोली कशी असते (अव्यक्त) आणि त्यामागचे मनातील अतिरेकी विचार काय असतात ? ह्याबद्दल अनेक विवाह प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करण्यात आले आहेत.दोन व्यक्तींमधील भावनिक सुसंवाद हा बऱ्याच अंशी मनातील अतिरेकी /विषारी विचारांवर अवलंबून असतो.ह्या अतिरेकी विचारांच्या मागे काही स्वतःबद्दलची आणि दुसऱ्याबद्दलची गृहीतिक आणि automatic thoughts असतात असं डॉ एरोन बेक ह्यांच्या प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे.त्याचप्रमाणे डॉ मार्टिन सेलीग्मन ह्यांच्या प्रयोगशाळेत मुलभूत आशावादी व निराशावादी विचारसरणीवर हे विचार अवलंबून आहेत असं दिसून आलं आहे.वरील संवादामध्ये मीनल निराशावादी विचारसरणीची असल्याने तिच्या मनातील विचार असे होते.
...
“ हा नेहमीच तक्रारी करून मला त्रास देत असतो”
मंदारचे मनातील समांतर विचार ..”ही माझं कधी ऐकतच नाही.स्वतःचच घोडं पुढ दामटते”
अशाप्रकारचे विचारच मग दोन व्यक्तींच्या नात्यामध्ये तेढ निर्माण करावयास लागतात,हळूहळू छेद निर्माण
होऊ लागतात,व्यक्ती दुरावतात,नाती तुटतात आणि ह्या सर्वांचा अर्थातच घरातील मुलांच्या वाढीवरही
विपरीत परिणाम होऊ शकतो.
विवाहामध्ये वादळ निर्माण होण्यामागे व विवाहाचा रथ चौफेर उधळण्यामागे ‘चार भावनांच्या
घोडेस्वारांचा’ हातभार नेहमीच असतो असा निष्कर्ष ह्या विवाह प्रयोगशाळेमध्ये काढण्यात आला आहे.त्या
आहेत ‘टीका,तिरस्कार,बचावात्मक पवित्रा आणि अलिप्तता !! ह्या घोडेस्वारांना ‘Four horsemen of
Apocalapsy’असं म्हणण्यात येत.खरतर विवाहाचा रथ जर प्रेम,आदर,विश्वास आणि जिव्हाळा ह्या चार
भावनांच्या घोडेस्वारांकडे असेल तर नातं फुलत जातं आणि चिरकाल टिकतही पण जर नात्याच्या टप्प्यांमध्ये
जर बोचरी वैयक्तिक टीका येऊ लागली तर मात्र विवाहरथ उधळून दिशाहीन प्रवास करू लागतो ज्याचा
अंतिम मार्ग विसंवादाकडे आणि घटस्फोटाकडे जातो.पती-पत्नी मधील विसंवाद हा ह्या चार भावनिक
टप्प्यामधूनच जात असतो.
ह्या विवाह प्रयोगशाळांमध्ये जसे भावनिक विसंवादाच विवेचन केले जातं तसच त्यावरील सुसंवादासाठी
उपायही सुचवले जातात.
वर उल्लेख केलेल्या प्रिया आणि मीनल च्या उदाहरणामध्ये विसंवाद बोचऱ्या वैयक्तिक टीकेने झाला आहे.मॉल मध्ये वेळेवर न पोहोचणारा नील आणि मुलांबद्दल तक्रार करणारा मंदार दोघांचही वर्तन अस्वीकारार्ह होतं.पण संवादामध्ये “किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेस तू “ आणि “सारखी कुरकुर आणि तक्रार करण्याची सवयच आहे तुझी” अशा वैयक्तिक टीकेमुळे पुढील आणिक भयंकर घोडेस्वार येऊन उभा ठाकला आणि तो म्हणजे
‘तिरस्कार(द्वेष)’. वैयक्तिक टीका कशी टाळायची हे आपण वर उदाहरणातून बघितले,आता टिके कडून प्रवास तिरस्काराकडे जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ह्यावर प्रयोगशाळेमधील उपाय सुचविले आहेत ते म्हणजे,आपण आपल्या भावना आणि मत दाबून न ठेवता ती योग्य प्रकारे व्यक्त करणे,प्रश्न आणि मतभेद हे त्याचवेळेस लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे.उदा.राग व्यक्त करताना तो दुसऱ्याच्या विशिष्ठ कृतीबद्दल असावा पण पूर्ण व्यक्तिमत्त्व किंवा चारित्र्याबद्दल नसावा.त्यामध्ये आरोप आणि दोष देणे नसावे.दोन पावलं मागे जाण होऊ शकतं,तसच तुमचं म्हणणं सांगताना “तू नेहमीच....” “तू कधीच ....” किंवा “ तू असंच कर ...”असे शब्द टाळणे होऊ शकते.अर्थात इथे नील आणि मंदार ह्यांनी आपल्या सहचारीण्यांचा राग वेळीच ओळखून,तो स्वीकारून त्यासाठी योग्य प्रतिसाद आणि कृती केली असती तर रागाची दिशा टीकेकडे गेली नसती.

विसंवादातील पुढचा घोडेस्वार ‘तिरस्कार’ हा जास्तच तीव्र आणि विघातक असतो.जोडीदाराला जर दुसऱ्याबद्दल तिरस्कार वा विद्वेष असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी आणि मन दुखावण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करते.ज्या घरात द्वेष आहे तिथे आपुलकी,जिव्हाळा आणि आदर कसा वसणार ? विवाह प्रयोगशाळेमध्ये घरात ‘तिरस्कार’ असण्याच्या काही खुणा सूचित केल्या आहेत त्याम्हणजे अपमानित करणे,अपशब्द वापरणे ,कुचेष्टा आणि कुत्सीतपणे बोलणे ई.प्रयोगशाळेमधील उपायही सुचवण्यात आले आहेत..ते म्हणजे जास्तीत जास्त लवकर तिरस्काराला घरातून हद्दपार करावे.त्यासाठी स्वतःची संवाद शैली,विचारांची दिशा व देहबोली तपासून ती बदलण्याचा प्रयत्न करावा.जर तिरस्करणीय किंवा अपमानित करणारे विचार मनामध्ये असतील तर ते खोडून हळुवार,आशादायी व सुखावणारे विचार मनामध्ये आणावेत उदा.जरी मला आता ह्याच्या वागण्याबद्दल अतिशय राग आणि घृणा वाटत असली तरी तो इतर वेळेस व्यवस्थितही वागतो....आधीच्या आयुष्यामधील चांगल्या गोष्टी,सुखावणारे क्षण आणि उत्साहवर्धक प्रसंग आठवून जोडीदाराविषयी तिरस्कार कमी करता येईल ..नाहीतर पुढचा घोडेस्वार घरामध्ये शिरकाव करतो आणि तो म्हणजे बचावात्मक पवित्रा आणि पळवाट शोधणे .जेव्हा जोडीदाराला आपला वारंवार अपमान झाल्यासारखा किंवा कमी लेखल्यासारखं वाटतं तेव्हा तिचा किंवा त्याचा प्रतिसाद हा दुर्लक्ष किंवा कानाडोळा केल्या सारखा होतो. अशावेळेस घरात एकमेकांना ऐकून घेतले जात नाही,जबाबदारी झिडकारली जाते, काहीतरी सबबी सांगितल्या जातात किंवा उलट दुसऱ्यावर टीका केली जाते. विवाह प्रयोशाळेमध्ये संवादामधील शब्दापलीकडील देहबोली चे निरीक्षण करण्यात आले आहे .सतत कुरकुर करणं,हाताची घडी घालून ऐकणे,किंवा मानेला सारखा हात लावणे ह्या काही खुणा बचावात्मक पवित्रा दर्शवतात.तो कमी करण्यासाठी उपाय म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या टीकेकडे ‘तिखट शब्दात सांगितलेली माहिती’ ह्या स्वरुपात बघणे! ह्यामुळे संवादातील तेढ कमी होऊ शकेल,एकमेकांना कान देऊन ऐकणे होईल आणि दुसऱ्याला अपमानित केले जाणार नाही.हे सर्व सांगणं सोपं पण करणं कठीण असलं तरी प्रयत्न केल्यास पुढे परिस्थिती विकोपास तरी जाणार नाही. “माझ्या वागण्याचा तुला इतका त्रास होईल हे कळले नाही मला. माझ चुकलं असेल..ह्यावर आपण थोडं बोलूया का? अशा शब्दातून नात्यामध्ये जवळीक,विश्वास आणि हळुवारपणा येऊ शकतो.नाहीतर पुढचा घोडेस्वार.. ‘अलिप्तता’ घरामध्ये येऊन उभा ठाकतो.जेव्हा जोडीदार एकत्र येऊन समन्वय साधू शकत नाहीत,प्रश्नांचं निराकरण करू शकत नाहीत किंवा नात्यामध्ये सतत टीका,तिरस्कार आणि पळवाट शोधण्यावर भर देतात तिथे हा पुढला आणि चौथा घोडेस्वार ‘अलिप्तपणा’ घरात हजर होतो.मनाची कवाड बंद केली जातात,संवादाला वाव दिला जात नाही आणि नात्यामध्ये भिंती उभारल्या जातात. विवाह प्रयोगशाळेमध्ये अलिप्तता दाखवण्यामध्ये ८५ टक्के पुरुषच असतात असं निष्पन्न झालं आहे. “ न बोललेलं बर, कारण बोललं तर परत परिस्थिती तणावपूर्ण होईल”अशी त्यांची मनोधारणा झालेली असते . आपण अलिप्तपणे वागतोय हे ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी प्रयोगशाळेमध्ये काही उपाय सुचविले जातात.आपल्या जोडीदाराला संवादामध्ये बोलताना जास्त संधी द्या,प्रतिसाद देताना पूर्ण लक्ष व कान देऊन ऐका,होकारार्थी मान हलवून किंवा ”हं.. असं म्हणून संवादातील तुमचा सहभाग व रस व्यक्त करू शकता. जर वाद्विवादामध्ये तीव्र भावना निर्माण होत असतील वा ताणताणाव निर्माण होत असेल तर अशावेळेस
विवाह प्रयोगशाळेमध्ये जोडप्यांना स्वतःचा pulse rate बघण्यास सुचवले जाते.जर हृदयाची गती २० अंकांनी वाढली तर तेव्हा संवाद थांबवून थोडा वेळ शांत होऊन अर्ध्या तासाच्या आत परत संवाद सुरु केल्यास उपयुक्त
ठरत असं दिसत.ह्यामुळे नात्याची रथ अलिप्ततेच्या वाटेवर भरकटत नाही विवाह प्रयोगशाळेतील सुचविलेल्या ह्या सर्व क्लुप्या,उपाय,कौशल्य आणि सूचना त्या चार भयंकर अघोरी घोडेस्वारांना नात्यामधून दूर ठेवण्यास आणि विवाह रथ उधळू न देण्यास नक्कीच मदत करतील.अशा प्रकारच्या विवाह प्रयोगशाळा लग्नांअगोदरच उपयोगात आणल्या तर ? त्यांविषयी जोडीदारांमध्ये भान निर्माण केले तर ? त्याचे नक्कीच पुढचे अघटीत टाळायला मदत होईल,विसंवाद टळेल ,रेशीमगाठी घट्ट होतील,सुसंवादाच ओएसीस निर्माण होईल!  


By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.

Thursday 17 August 2017

मनाचं तापमान


शरीराचं तापमान जसं असतं तसं मनाचही असतं,आणि हे मानसिक तापमान शरीराच्या
तापमानाशी अगदी संलग्न असतं असं गेल्या दशकातील संशोधनातून निष्पन्न झालं आहे.सकाळी
गरम चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर आपल्याला छान वाटतं ते ह्या मानसिक तापमानाशी
निगडीत आहे.एखादा रागावला तर आपण सहजपणे म्हणतो ,तो “गरम झाला” किंवा एखादा
भावनिक प्रतिसाद देत नसेल तर आपण त्याला “थंड रक्ताचा”(cold blooded) असं संबोधतो.आपल्या भावना आणि शरीराचं तापमान यांतील संबंधावर खोलवर जाऊन संशोधन आणि विलक्षण प्रयोग झाले आहेत. मायेची ‘ऊब’,’थंडगार प्रतिसाद’ हे फक्त रूपक म्हणून वापरलेले शब्द नाहीत तर त्यामागील शरीरातील यंत्रणा कशी काम करते हे शास्रीय प्रयोगातून निष्पन्न झालं आहे.


येल विद्यापीठात दहा वर्षांपूर्वी शारीरिक आणि मानसिक तापमानावर व त्यांमधील दुव्यांवर विलक्षण प्रयोग करण्यात आला. ह्या प्रयोगामध्ये ४१ विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत बोलाविण्यात आलं.उद्वाहकामधून(Eleveter)चौथ्या मजल्यावरील प्रयोगशाळेत जाताना एक महिला प्रत्येक विद्यार्थ्याला गरम कॉफीचा कप किंवा थंडगार कॉफीचा कप हातात धरावयास सांगते.प्रयोगशाळेत गेल्यावर त्यांना एका काल्पनिक क्ष व्यक्तीबद्दल माहिती सांगितली जाते आणि त्या माहितीवरून त्याचे व्यक्तिमत्व किती उबदार आहे हे पारखायला सांगितलं जातं.प्रयोगाचा निष्कर्ष अतिशय अनोखा येतो .ज्या विद्यार्थ्यांनी गरम कॉफीचा कप हातात धरला असतो ते विद्यार्थी तो व्यक्ती प्रेमळ,दयाळू आणि मनमिळाऊ आहे असं पारखतात तर त्या उलट थंडगार कॉफीचा कप हातात घेणारे विद्यार्थी त्या क्ष व्यक्तीला प्रेमळपणाबद्दल कमी गुणांक देतात ! जेव्हा त्या विद्यार्थ्यांचे हात उबदार होतात तेव्हा त्यांचं मनही उबदार होतं असाच निष्कर्ष या प्रयोगातून निघाला !!

आणिक एका प्रयोगात सहभागी व्यक्तींना अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांचे फक्त चेहेरे दाखविले जातात आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल कयास करावयास सांगितले जाते.ह्या प्रयोगाआधी काहींना उबदार(७९F) तर काहींना थंडगार(६८F) खोलीमध्ये बसविले जाते.जे सहभागी उबदार खोलीत थांबलेले असतात ते गुन्हेगारांनी कमी तीव्रतेचा गुन्हा उदा भुरटी चोरी, करचुकवेगिरी केला असेल असा अंदाज व्यक्त करतात तर त्यापेक्षा ११ डिग्रीने कमी तापमान असलेल्या थंडगार खोलीमध्ये थांबलेले सहभागी त्याच गुन्हेगारांनी अट्टल गुन्हा केला आहे उदा मर्डर,अपहरण करणे इ असा अंदाज बांधतात ! हे सर्व त्यांच्या मानसिक तापमानाशी निगडीत आहे एकमेकांबद्दल प्रेम,विश्वास आणि सहकार्याची भावना ही शारीरक तापमानाशी निगडीत आहे असं सिद्ध झालं आहे.त्यासाठी एक प्रयोग करण्यात आला.चाळीस सहभागी व्यक्तींना ह्या प्रयोगात पाचारण करण्यात आलं.फंक्शनल एमाराय(fMRI) नावाच्या मेंदूच्या कार्याचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक यंत्राखाली त्या व्यक्तींना ठेवण्यात येतं.त्यांना एक आगळावेगळा खेळ खेळावयास दिला जातो.ह्या खेळात त्यांना आदमासानं थोड्या प्रमाणात पैसे दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर गुंतविण्यात सांगण्यात येते.

त्या यंत्राखाली असताना मग त्यातील काहींना बर्फाचा थंडगार तुकडा काही सेकंद हातात धरावयास सांगण्यात येतो.तर काहींना गरम केलेला डबा हातात दिला जातो.ह्या प्रयोगांती संशोधकांना असं दिसून येतं की ज्याना थंड गोष्ट दिली गेली ते दुसऱ्या व्यक्तीबरोबर विश्वास ठेवून पैसे गुंतविण्यासाठी तयार नव्हते.मेंदूमधील कुठला भाग हा निर्णय घेताना उद्दीपित होत आहे त्याचप्रमाणे शारीरिक तापमानाची नोंद कुठे करण्यात येते हे त्या fMRI मशीन खाली बघण्यात आलं .शारीरिक तापमान आणि मानसिक तापमान मेंदूमधील एकाच भागामधून प्रवर्तित होतं असं निष्पन्न झालं.इन्सुला (Insula)ह्या भागातून हे सर्व कार्य होत असतं असं सिद्ध झालं आहे. आता ह्या सर्व प्रयोगांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घ्यावयाचा हे पाहूया.

नवजात बाळाला जेव्हा त्याची आई आपल्या कुशीत घेते तेव्हाही फक्त शारीरिक तापमान नाही तर मानसिक तापमान,मायेची ऊब,प्रेम आणि विश्वास ह्या भावना ही त्यामधून संक्रमित होतात आणि परस्पर सुरक्षित वातावरण ती माता त्या बाळासाठी निर्माण करू शकते. आंटार्टिका मध्ये पेंग्विन जसं दाटीवाटीने राहून एकमेकांना उब देतात तसंच आजकाल विविध खेळाडूही खेळ सुरु व्हायच्या अगोदर huddle करताना आपण बघतो.त्यामध्ये एकमेकांना आलिंगन देऊन फक्त शारीरिक नाही तर मानसिक तापमान वाढून एकमेकांबद्दल विश्वास आणि सहकार्याची भावना वाढीस लागु शकते.


गमतीनं असंही म्हणता येईल की पुढच्या वेळेस तुम्हाला तुमच्या बॉस कडून बढती हवी असेल तर गरम कॉफीचा कप त्यांच्या हातात नक्की देऊन बघा! त्यांना तुमच्या बद्दल जास्त आपुलकी वाटून कदाचित तुमचं काम फत्ते होईल !!


By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.

Tuesday 8 August 2017

प्रयोग संयमाचा


एकविसाव्या शतकात कुणाला थांबायला वेळ नाही...जो तो पायाला भिंगरी
लागल्यासारखं पळत असतो.मुलांमध्ये हवी असलेली गोष्ट मिळेपर्यंत थांबण्याचा 
धीर नाही तर मोठ्यांमध्ये झटपट श्रीमंती साठी चढाओढ लागलेली दिसते.रस्त्यावरसिग्नलला लालचा पिवळा आणि पिवळ्याचं हिरवा सिग्नल व्हायला पण धीर धरवत नाही..आधीच सिग्नल तोडून पुढे जायचं असतं..

एवढी घाई कशासाठी? आपण जास्त आवेगशील झालो आहोत का? मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये सहनशक्ती,धीर आणि संयम आता विरळा होत चालला आहे का? सब्र का फल मीठा होता है....हे फक्त संतांच्या ओव्यापुर्तच मर्यादित राहिल आहे का ?

स्वतःच्या आवेगावर हळूहळू ताबा मिळविण्यास मुल अगदी एक वर्षांपासून शिकू लागतं.जसजसं मुल मोठ होतं तसं तीन ते सात वर्षांपर्यंत ती विविध अनोख्या पध्दतीनं स्वतःवर ताबा मिळवणं अपेक्षित असतं.नंतर पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये तीव्र भावनांना योग्य दिशा देणं,हव्या असलेल्या गोष्टीसाठी जास्त काळ धीर धरणं,ह्या गोष्टी अपेक्षित असतात.पण ह्या सर्व गोष्टी प्रत्येक मुलामुलीच्या बाबतीत दिसतातच असं नाही.काही मुलं अगदी ४-५ वर्ष लहान असतानाही संयम दाखवू शकतात तर काही प्रौढ सुद्धा आवेगशील आणि उतावळे असतात.

संशोधकांच्या मते ‘आवेगावर ताबा मिळविणं’(Impulse control) आणि ‘जास्त लाभासाठी थोडं काळ संयम दाखवता येणं’ (Delaying Gratification) ही दोन भावनिक कौशल्यं याला आवश्यक असतात.ही संयमाची कौशल्य तपासण्यासाठी आणि त्याचा भावी आयुष्यावर कसा लक्षणीय परिणाम होतो हे बघण्यासाठी एक अदभूत प्रयोग बऱ्याच वर्षांपूर्वी स्टान्फर्ड विद्यापीठामध्ये करण्यात आला.Marshmallows Test म्हणून हा प्रयोग जगप्रसिद्ध आहे. १९६० साली स्टान्फर्ड विद्यापीठातील बिंग नर्सरी स्कूलच्या ‘सरप्राईज रूम’ मध्ये हा अनोखा प्रयोग सुरु करण्यात आला,जो आजतागायत चालूच आहे.

ह्या प्रयोगात विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ४-५ वर्षांच्या मुलामुलींना एक एक करून ‘सरप्राईज रूम’ मध्ये नेण्यात आलं.त्या रूम मध्ये एका टेबल वर मार्शमेल्लो (Marshmallow) नावाची मुलांना आवडणारी अमेरिकन मिठाई ठेवण्यात येते. प्रत्येक मुलाला रूम मध्ये गेल्यावर दोन पर्याय देण्यात येतात. पहिल्या पर्यायाप्रमाणे आता लगेचच ती मिठाई खाऊ शकतोस असं त्यांना सांगण्यात येतं.दुसऱ्या पर्यायामध्ये त्यांच्या संयमाची थोडी कसोटी घेतली जाते.संशोधक रूम बाहेर जाऊन वीस मिनिटांनी परत येणार आहे असं सांगण्यात येतं,जर वीस मिनिटं मिठाई न खाता थांबलात तर त्यांना एक ऐवजी दोन मार्शमेल्लो मिळतील,असं सांगण्यात येतं !!

ती चार वर्षांची चिमुरडी समोर असलेल्या प्रलोभनावर विजय मिळवतात का नाही ?..आपल्या आवेगावर त्यांचा किती ताबा आहे आणि पुढे होणाऱ्या जास्त लाभासाठी ती थोडा काळ संयम दाखवू शकतात का ? ह्या विविध भावनिक कौशल्यांची तपासणी ह्या प्रयोगातून करण्यात येते. त्यातील काही मुलं मिठाई न खाता वीस मिनिटं थांबू शकतात तर काही संशोधक रूम बाहेर गेल्यावर त्वरित त्या मिठाईचा फडशा पाडतात. हा सर्व वीस मिनीटाचा त्यांचा संघर्ष छुप्या विडीयो कॅमेरा मध्ये टिपण्यात येतो.

आपल्या मनातील तीव्र इच्छेवर काबू मिळवताना मुल विविध अनोख्या पद्धतीचा अवलंब करतात.काही स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवतात,काही मिठाई तोंडापाशी आणून आपण खाल्याचा काल्पनिक विचार करून परत ठेवून देतात तर काही गाणं गुणगुणत तर काही दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करून आवेगावर ताबा मिळवतात. एवढ्यावर संशोधक थांबले नाहीत.त्यांनी ह्या मुलांचा पुढची २० वर्ष सलग पाठपुरावा केला.त्याचं प्रौढ झाल्यावर वर्तन,शारीरिक आणि मानसिक आरोग्य,त्यांची अभ्यासातील प्रगती आणि त्यांचा नातेसंबंध या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.त्यातील निष्कर्ष अतिशय लक्षणीय होते.

त्या प्रयोगातील जी मुलं मिठाई न खाता वीस मिनिटं थांबू शकली ती पुढे जाऊन पप्रौढपणी खेळकर,उत्तम मानसिक आरोग्य असलेली व सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षांमध्ये जास्त यशस्वी झालेली दिसली.भावनावेगावर ताबा मिळवणं आणि प्रलोभनाला बळी न पडता भविष्यातील जास्त लाभासाठी संयम ठेवता येणं ह्या दोन कौशल्याचा दूरगामी चांगला परिणाम ह्या अनोख्या प्रयोगातून अधोरेखित झाला आहे.

या प्रयोगाअंती संशोधकांनी काही क्लुप्त्या सांगितल्या आहेत. आपल्या पाल्यामध्ये ही संयमाची कौशल्य वाढवण्यासाठी आपण तीन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे त्यांना लहानपणापासूनच काही गोष्टींबाबत ‘नकार’ झेलण्याची सवय करणं,दुसरं म्हणजे हवी असलेली गोष्ट मिळवताना काही आव्हानं निर्माण करून थोडा थांबायला लावून संघर्ष करण्याची सवय करणं आणि तिसरी क्लुप्ती म्हणजे प्रलोभनं असताना निर्माण होणाऱ्या मनातील तीव्र भावनांनाबाबत त्यांना बालपणीच साक्षर करणं.संयमाची पाळमुळं अशी बालवयात रुजुविता येतात.नाहीतर पुढे जाऊन आवेगांवर ताबा नसल्यामुळे व प्रलोभनाला बळी पडून आयुष्याची गाडी रुळावरून घसरायला वेळ लागत नाही.


By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.

How to make your anxiety work for you instead of against you

Anxiety is energy, and you can strike the right balance if you know what to look for. While some cases of anxiety are serious enough t...